मनसेचा नवा झेंडा; संभाजी ब्रिगेडचा विरोध
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी
नव्या वर्षात मनसेचे नव्या जोमाने कामाला लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. मात्र, हा झेंडा प्रसिद्ध होण्याआधीच वाद सुरू झाला असून संभाजी ब्रिगेडने मनसेच्या या नव्या झेंड्याला विरोध केला आहे.
राजकारणात चढउतार होत असतात. परंतु. मतांसाठी जाती धर्माचा उपयोग करून झेंड्याचा रंग सुद्धा सरड्यासारखे सतत बदलला, असे रंग राजकारणात बदलता येत नाही. मनसेने आता नवीन भगवा झेंडा निर्माण करून त्यावर ‘राजमुद्रा’ छापलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ ही राजकारण करण्याचे साधन नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी राजमुद्रेची निर्मिती केलेली आहे. त्या राजमुद्रेचा वापर कुठल्याही पक्षांनी राजकारण करण्यासाठी करू नये, असं म्हणत संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. तसेच राज्याचे निवडणूक आयोग, छत्रपती यांचे वंशज आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडेही या झेंड्या विरोधात आणि तक्रार करणार असल्याचंही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केलं.
आम्ही भारतीय संविधान आणि लोकशाही मानणारे व्यक्ती आहोत. परंतु, ‘राजमुद्रा’ वापरणं हे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही. भगवा झेंडा हा समता, समता आणि बंधुतेचा प्रतीक असून तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज शांतीचे सुद्धा प्रतिक आहे. तेच त्यांनी स्वीकारावं, त्यांनी हिंदुत्वाची झालर पांघरू नये. पहिल्या मूळ झेंड्यात जातीचे रंग वापरले गेले? आता या जातीच्या रंगाचा मनसे करणार काय? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी विचारलाय.