जेएनयूतील हल्ला पाहून 26/11ची आठवण झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई | दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. हा हल्ला पाहून 26/11 मुंबई हल्ल्याची आठवण झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेएनयू हल्ल्याचा निषेध केला. तसेच जेएनयूसारखा प्रकार राज्यात होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या केसांनाही धक्का लागणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिली. जेएनयू हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याचा निषेध केला.
नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये रविवारी (5 जानेवारी) मास्कधारी हल्लेखोरांना राडा घातला. हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्यांसह मुलींच्या हॉस्टेलवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी यावेळी जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोषलाही मारहाण केली. सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल किंवा मास्क लावले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या 18 जणांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे.