मनपा प्रशासनाकडून वाकडमधील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांशी ‘खिलवाड’
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सापडले संकटात
- माध्यमिक शाळेसाठी पाठपुरावा करूनही प्रतिसाद ढिम्म
पिंपरी, (महाईन्यूज) – उच्चभ्रु वसाहतीचा भाग असलेल्या वाकडमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील अथवा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची माध्यमिक शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना थेरगावातील शाळेत जावे लागते. त्यासाठी तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी पालिका प्रशासन खिलवाड करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर संपत कस्पटे यांनी केला आहे.
- पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विभागाला कस्पटे यांनी याबाबत आज निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाकडमधील उच्चभ्रु वसाहतीत राहत असलेल्या रहिवाशांच्या मुलांसाठी खासगी शाळांची सुविधा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे वार्षिक शूल्क अवाढव्य आहेत. ते मध्यमवर्गीय व आर्थिक दुर्बल कुटुंबातील रहिवाशांना परवडणारे नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. परंतु, या भागात महापालिकेची माध्यमिक शाळा नसल्यामुळे या घटकातील मुलांना शिक्षणासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे. वाकड परिसरातल्या मुलांना माध्यमिक शाळेसाठी थेरगावमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना तीन किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे.
कस्पटे वस्ती येथे माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, मनपा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नसल्याचे दिसते. गेल्या कित्येक वर्षांपासून मनपा प्रशासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खिलवाड करत आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन माध्यमिक शाळा होण्यासाठी पाऊल उचलावे. यंदा शक्य नाही झाले, तरी पुढच्या शैक्षणिक वर्षात वाकडमधील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होईल, अशी अपेक्षा कस्पटे यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.