मध्य प्रदेशमध्ये १००० गोशाळा सुरू होणार, कमलनाथ सरकारची योजना
मध्य प्रदेश सरकारही आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या धर्तीवर जाताना दिसत आहे. कमलनाथ सरकार राज्यात १००० गोशाळा सुरू करणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात संपूर्ण राज्यातून सुमारे १ लाख गायी यामध्ये सुरक्षित ठेवण्यात येतील. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष अधिकारी भूपेंद्र गुप्ता यांनी येत्या मे पासून या १००० गोशाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यास अजून ६ महिने बाकी आहेत. यासाठी ४५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील अशाप्रकारची ही पहिलीच योजना असल्याचे भूपेंद्र गुप्ता यांनी सांगितले.
ते म्हणाले, राज्यात अशा पद्धतीची कोणतीही सरकारी गोशाळा आतापर्यंत सुरू करण्यात आली नव्हती. १००० गोशाळेच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच ती पूर्ण केली जाईल.
राज्यात ६ लाख गायींच्या सुरक्षततेची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकार त्यांची सुरक्षा लक्षात घेत ही योजना लागू करत आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ६१४ वैयक्तिक गोशाळांची संख्या वाढवून ६००००० केली जाणार आहे. या गोशाळेत १,६०,००० गायींची सुरक्षा केली जाईल. सध्या सुरक्षेसाठी प्रति गाय ४.५० रूपये खर्च केले जातात. ते वाढवून २० रूपये प्रति गाय केले जाणार आहे.