मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर बीरसिंहपूर गावाजवळ स्कूल व्हॅन आणि बसची समोरासमोर धडक होऊन किमान ७ शालेय विद्यार्थी आणि व्हॅन चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.
पोलीस अधिक्षक संतोषसिंह गौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरसिंहपूर येथे झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ८ ते ९ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सुमारे १०.३० च्या सुमारास झाला. सर्व विद्यार्थी हे बीरसिंहपूर येथील लकी कॉन्वेंट स्कूलचे होते. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल जैन, पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. अपघाताची विस्तृत माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली असून पीडितांच्या कुटुंबीयांना त्वरीत मदतीचे आदेशही दिले आहेत.