अपघातामुळे मुंबईकर संतप्त, मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे प्रचारसभेत व्यस्त
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळून सहाजण ठार झाले आणि ३५ हून अधिकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे समस्त मुंबईकर संतप्त झाले आहेत. मात्र उठसूट मुंबईकरांचा कैवार घेऊ पाहणारे उद्धव ठाकरे अपघातातील जखमींची साधी चौकशीही न करता अमरावतीतील प्रचारसभेत व्यस्त होते. घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्यही उद्धव यांनी दाखवले नाही. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला जोडणारा पूल गुरुवारी संध्याकाळी कोसळला. ऐन गर्दीच्या वेळी घरी परतणारे चाकरमानी या दुर्घटनेत बळी पडले. त्यानंतर प्रशासनाची धावाधाव उडाली. या दुर्घटनेननंतर ‘या पुलाची जबाबदारी कुणाची?’ असा प्रश्न निर्माण झाला असताना मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे यंत्रणेने नेहमीप्रमाणे एकमेकांवर बोट दाखवण्यास सुरूवात केली. दुर्घटनेची जबाबदारी झटकणारया पालिकेने अखेर हा पुल त्यांच्या अखत्यारित येत असल्याचे कबुल केले.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये जाऊन पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. यानंतर त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करूनही अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ‘या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी’ अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुसरीकडे मुंबईकरांचे स्वयंघोषित कैवारी उद्धव ठाकरे घटनास्थळी फिरकलेच नाहीत. मातोश्री या त्यांच्या निवासस्थानापासून घटनास्थळ अवघ्या १८ किलोमीटरवर आहे. मात्र जखमींची विचारपूस करण्याचे सौजन्य न दाखवता ते सेना-भाजप युतीच्या मेळाव्यासाठी अमरावतीला निघून गेले. अमरावतीच्या आपल्या भाषणातही त्यांनी या घटनेचा साधा उल्लेखही केला नाही. सभा संपल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून, अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.