मंत्रोच्चार केल्याने वाढते पीक, कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा अजब दावा
मंत्रोच्चार केल्याने पीक जोमात वाढते असा अजब दावा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केला आहे. शुक्रवारी आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना विद्यापीठात हा प्रयोग घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. मंत्रोच्चारामुळे पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो असं त्यांनी म्हटलं असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
कुलगुरु डॉ विलास भाले यांनी म्हटलं आहे की, ‘संपूर्ण विश्वावर संगीताची जादू असून अमेरिकेसारख्या देशालाही शास्त्रीय संगीताची भूरळ पडली आहे. संगीतामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. मंत्रोच्चाराचा पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो. मंत्रोच्चारामुळे मानसिक थकवा दूर होतो. या सर्वात तबला आणि बासरीची लय सर्वात महत्त्वाची असते’. त्यांच्या या वक्तव्यावर अंनिस तसंच काही शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असून या वक्तव्याला कोणता आधार आहे अशी विचारणा केली.
कुलगुरु डॉ विलास भाले यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. ‘माझा पिंड संशोधकाचा असल्यामुळे जे प्रयोगाअंती सिद्ध होते तेच स्वीकारतो. मंत्रोच्चार केल्याने पचाराने कोणत्याही पिकावर काहीही परिणाम होत नसल्याचे माझे मत असून काहीतरी गैरसमजातून ते वक्तव्य प्रकाशित झाले’, असे डॉ. भाले यांनी स्पष्ट केल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.