मंत्रिपद देण्यासाठी रक्ताने लिहीलं पत्र; या पत्राची सध्या सोशल मिडीयात चर्चा
पुणे |महाईन्यूज|
पुणे जिल्ह्यातील एका युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यासाठी शिवसेनेला मंत्रीपद द्या आणि ते उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना द्या असे म्हणत ही मागणी आपल्या रक्ताने लिहून हे पत्र थेट उद्धव ठाकरेंना पाठविले.
शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी युवासेनेच्या शिरुरच्या बापूसाहेब शिंदे यांनी आपल्या रक्ताने लिहीलेले पत्र नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. या पत्राची चर्चा सध्या सोशल मिडीयात चांगलीच असली तरी अशा प्रकारांमुळे शिवसैनिक आता स्वभाव बदलणार का आणि तो कसा बदलनार असा प्रश्न खुद्द ठाकरेंनाही पडणार आहे.
मुळात शिंदे यांची मागणी योग्य आहे, व्यवहार्य आहे हे नाकारुन चालणार नसली तरी मंत्रीपद देण्याचा निर्णय शिवसेनेसाठी एवढा सोपा नाही. तीन पक्षांच्या आघाड्या, प्रत्येक पक्षातील नेत्याचे, त्याच्या जिल्हा-तालुक्यातील राजकारणाचा या मंत्रीपदाशी थेटपणे परिणाम हे सगळेच मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांना संभाळावे लागणार आहे.
`आपण सत्तेत आलोय, आता आपला स्वभाव बदला’ असे चारच दिवसांपूर्वी पुण्यात येवून जाहिरपणे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आता शिवसैनिकांचे असे आक्रमक स्वभाव बदलण्याचे आव्हान असणार आहे.
त्या पत्रावर काय म्हणाले आढळराव पाटील
`मी कुठल्याच मंत्रिपदासाठी इच्छूक नाही. पुणे जिल्ह्यात शिवसेना अगदी तळागाळापर्यंत पोहचेल व ठाकरे सरकार म्हणून प्रत्येक गावपातळीवर पक्षाचा प्रचार-प्रसार होईल यासाठीच आपण तमाम शिवसैनिकांना सोबत घेवून काम करणार आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली.