भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अटक करा
सामाजिक कार्यकर्त्या अंजना गायकवाड यांची मागणी
पिंपरी | प्रातिनिधी
भीमा कोरेगाव येथे जातीय मानसिकतेतून दंगल घडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामधील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजना गायकवाड यांनी केली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी केली.
गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या भीमा कोरेगाव येथे जातीय सूडबुद्धीतून केलेल्या हल्ल्याला तीन वर्ष पुर्ण होत आहेत. याच पार्श्वभुमिवर मागील काळात भाजप सरकारने याच्यावर कूठलीही कारवाई केली नाही. सध्या स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार हे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर स्थापन झालेले आहे. त्याचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे भीमा कोरेगाव हल्ल्यातील प्रमुख आरोपिंना यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. तसेच आंबेडकरी आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, ही मागणी करण्यात आली.
या वेळी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दिले.