भारत-श्रीलंका महिला वन-डे सामन्यात बेटींगचा प्रयत्न? कोलंबोच्या मैदानातून भारतीय नागरिकांना हटवलं
रविवारी कोलंबो येथे पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका महिला वन-डे सामन्यादरम्यान, ५ भारतीय नागरिकांना मैदानातून हटवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. श्रीलंकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नागरिकांच्या संशयीत हालचालींमुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. या पाचही भारतीय नागरिकांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
संपूर्ण सामन्यादरम्यान हे भारतीय नागरिक सतत फोनवर बोलत होते. चौकशी केली असताना, त्यांनी आपल्या घरच्यांचा सामन्याचे अपडेट्स देत असल्याचं सांगितलं. मात्र कदाचीत ते बुकींशी बोलत असल्याचा संशय आल्याने आम्ही त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं, मैदानातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
अखेरच्या वन-डे सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाने भारतावर ३ गडी राखून मात केली. भारताची कर्णधार मिताली राजने अखेरच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली, मात्र तिची ही खेळी वाया गेली. अखेरच्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरीही भारतीय संघाने मालिका २-१ ने जिंकली आहे. भारत व श्रीलंका यांच्यातील ही मालिका ICC Womens Championship चा भाग असून यामधून ३ संघांना २०२१ साली होणाऱ्या महिला विश्वचषकात थेट प्रवेश मिळणार आहे.