पंतप्रधानांनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली – भारतात दररोज ३ लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच बेड, ऑक्सिजन, औषधांची कमतरता आणि लस टंचाईने डोकं वर काढलं आहे. देशातील या गंभीर परिस्थितीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३० एप्रिल) मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विविध राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनची स्थिती, लसीकरणाची प्रगती आणि औषधींचा साठा या मुद्द्यावर चर्चा केली जाणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांसह स्वतंत्र पदभार असलेले आणि राज्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांमुळे आणि कोरोनाबळींच्या संख्येमुळे देशात भीतीदायक दृश्य निर्माण झालं आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कान उघडणी केली होती. केंद्राला राष्ट्रीय कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यावर सरकारनेही १०२ पानी प्रतिज्ञा पत्र दाखल करत भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर नजर ठेवून असल्याचे केंद्राने म्हटले होते. त्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.