भारत-बांगलादेश सुवर्ण अध्यायाचे सुतोवाच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची शनिवारी भेट घेतली. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने आपण सुवर्णअध्याय लिहू या, असे मोदी यांनी हसिना यांना बंगाली भाषेत सांगितले.
भारतामधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कार्यक्रमाविरुद्ध भूमिका घेऊन दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये बाधा निर्माण होईल असे कोणतेही पाऊल उचलण्यात येणार नाही असा विश्वास दोन्ही देशांनी व्यक्त केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
मोदी आणि हसिना यांना मोठा राजकीय जनादेश मिळाला असूबन दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशामध्ये नवे पर्व सुरू केले आहे. बांगलादेशच्या संसदेत हसिना यांना मोठे बहुमत आहे तर भारतामध्ये विरोधी पक्ष दुबळा आहे. एनआरसीवरून चिंता करण्याचे कारण नाही, असे आश्वासन मोदी यांनी हसिना यांना न्यू यॉर्कमध्ये झालेल्या भेटीच्या वेळी दिले. एनआरसी ही न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि ती कशी पूर्ण होईल ते पाहावे लागेल, असे मोदी यांनी हसिना यांना सांगितल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
शेख हसिना यांनी सांगितले की , दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांत उच्च पातळीवर असून सागरी सुरक्षा, नागरी अणुऊर्जा, व्यापार या विषयांवर आम्ही सहकार्य करीत आहोत. तत्पूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हसिना यांची भेट घेऊन चर्चा केली. परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे की, जयशंकर यांनी शेख हसिना यांच्याशी चर्चा केली असून बांगलादेश बरोबरच्या संबंधांना अग्रक्रम आहे. हसिना यांचे गुरुवारी चार दिवसांच्या भारत भेटीसाठी आगमन झाले. जागतिक आर्थिक मंचच्या बैठकीस त्या उपस्थित होत्या. संसदीय निवडणुकांनंतर हसिना यांची ही पहिलीच भारतभेट आहे.