भारताचा चीनला साखर खरेदीसाठी आग्रह
बिजींग – भारताने चीनला भारतीय साखर खरेदीचा आग्रह धरला असून त्या देशाला पंधरा दशलक्ष टन साखर निर्यात करण्याचा भारताचा इरादा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच झालेल्या चीन भेटीत त्यांनी त्या देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे हा विषय मांडला आहे. या बाबत चीनच्या साखर उत्पादक कंपन्यांच्या सुमारे 50 जणांच्या शिष्टमंडळाने या संबंधात भारतीय साखर महासंघाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. साखरेचा हा करार एकूण 350 दशलक्ष डॉलर्सचा असेल.
भारताकडे आजमितीला सुमारे 70 दशलक्ष टन इतका साखरेचा जादा साठा आहे. यंदा चांगला पाऊस अपेक्षित असल्याने पुढील वर्षीही भारताकडे जादा साखर उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे अशी माहिती भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष गौरव गोयल यांनी सांगितलीे. चीनी साखर उत्पादकांशी चर्चा केल्यानंतर ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. भारताने आत्ता पर्यंत केवळ पुर्व अफ्रिका आणि श्रीलंकेला साखर निर्यात केली आहे. आता त्यांनी साखरेच्या मार्केटसाठी चीनचा नवीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला चीनकडून अद्याप होकारात्मक प्रतिसाद मिळायचा आहे.
चीन दरवर्षी साडे चार लाख टन साखर ब्राझील, थायलंड, क्युबाकडून आयात करतो. सन 2007 साली भारताने चीनला दोन लाख टन साखर निर्यात केली होती. साखरेच्या पडून राहिलेल्या साठ्यामुळे भारतात साखर उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागत असून त्याचे विपरीत परिणाम उस उत्पादकांवरही होत आहेत. या पार्श्वभूमीवर चीन खेरीज बांगलादेशलाही साखर निर्यात करण्याचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे.