भाजप हा गांभीर्य नसलेला पक्ष, शिवसेनेनं फटकारलं
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी ठोस पावलं उचलली जात आहे. परंतु, भाजपकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत न करणाऱ्यावर शिवसेनेनं भाजपवर मुखपत्र असलेल्या सामनातून सडकून टीका केली आहे.
आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोना बाधणार असेल तर त्या एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर `दंडुका’ हाणणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे. पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा, असा सल्लावजा टोलाही भाजपला लगावण्यात आला.
तसंच, हा समय वादविवादाचा नाही. टीका, आरोप करण्याचा नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचविण्याचा आहे. सरकारी पगार स्वत:च्या राहत कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे? असा सवालही सेनेनं उपस्थितीत केला आहे.