भाजप नेत्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर; संरंक्षण खात्याच्या बैठकीला दिली बगल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील भाजपच्या जबाबदार पदाधिका-यांनी शहराशी संबंधीत संरक्षण खात्याचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला नाही. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबीत राहिले आहेत. हे प्रश्न न सुटण्यास भाजप नेत्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी केला आहे.
याबाबत कलाटे यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 27) महाराष्ट्रातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित प्रलंबित विकास कामांविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये पुणे विमानतळासाठी 15.84 एकर जागा हस्तांतरित करणे, विमानतळासंदर्भात इतर मान्यता देणे, चांदणी चौक आणि एनडीए पाषाण रोडच्या परवानग्या देणे इत्यादी पुणे जिल्ह्याशी संबंधीत कामे मार्गी लावली आहेत.
परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असेलेली पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटीचा रस्ता हस्तांतरित करणे, पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलास संरक्षण विभागाकडून परवानगी मिळवणे. तसेच निगडी, यमुनानगर, तळवडे रुपीनगर, त्रिवेणीनगर तसेच भोसरी, दिघी, च-होलीमधील काही भाग रेड झोनने बाधित होत असल्यामुळे येथील बांधकामांना परवानगी दिली जात नाही. रेड झोन हद्द कमी करण्यासाठी भाजप सत्ताधा-यांकडून पाठपुरावा झाला नाही. परिणामी, ही कामे अद्यापही प्रलंबित राहिली आहेत.
महापालिकेतील भाजपच्या कारभा-यांनी पाठपुरावा केला असता तर गुरूवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरील कामे मार्गी लागली असती. परंतु, भाजपच्या बेजबाबदार पदाधिका-यांमुळे हे प्रश्न अद्यापही प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे शहरातील भाजप कारभा-यांचा नाकर्तेपणा परत एकदा दिसून आला आहे.
भाजपने दोन वर्षातच पिंपरी-चिंचवडकरांचा भ्रमनिरास केला आहे. शहरातील कचरा, पाणी पुरवठा, आरोग्य इत्यादी मूलभूत गरजा व्यवस्थित पुरवू शकलेले नाहीत. केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसने जे प्रकल्प राबविले, ते सुध्दा भाजप सत्ताधा-यांना नीट सांभाळता येत नाहीत.
– मयूर कलाटे, नगरसेवक, राष्ट्रवादी