भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीत पराभव : शिवसेना
मुंबई | महाईन्यूज
दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र असून आम आदमी पक्ष दिल्लीचं तख्त पुन्हा राखणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मतमोजणीच्या सध्याच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष जवळपास 55 आणि भाजपा 15 जागांवर आघाडीवर आहे. यावरुन भाजपाचा दिल्लीमध्ये पराभव होणार असल्याची चिन्हे दिसताच शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी, भाजपाच्या अहंकाराचा दिल्लीमध्ये पराभव झाला अशी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, महाराष्ट्रात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचा दिल्लीत परिणाम दिसतोय असंही ते म्हणाले.
“दिल्लीतील जनतेने विकासालाच मत दिलं. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आणि पर्यायाने भाजपाला नाकारले. हा पराभव म्हणजे भाजपाच्या अहंकाराचा पराभव आहे. भाजपाच्या हातातून आता अनेक प्रदेश निसटले आहेत, वसेनेमुळे देशातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे. देशद्रोहाचा मुद्दा या निवडणुकीत गाजला. त्यावर अनिल परब म्हणाले की, देशद्रोहाची व्याख्या कोण्या एकाने ठरवून चालत नाही. ती लोकांनीही मान्य करावी लागते. लोकांना काय मान्य आहे, हे लोकांनी आज दिल्लीत दाखवून दिलंय. यासोबतच त्यांनी आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदनही केले.