भाजपने मुख्यमंत्रिपदच काय, साक्षात इंद्राचं आसन जरी ठेवलं तरी नको : संजय राऊत
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. “आता कोणी इंद्राचं आसन जरी दिलं, तरी आम्हाला नको”, असं म्हणत त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचे सर्व मार्ग शिवसेनेने बंद केल्याचे संकेत दिले आहेत. तसेच, पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद एक शिवसैनिकच भूषवेल असंही त्यांनी सांगितलं. राज्यात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महासेनाआघाडीच्या पुढच्या वाटचालीबाबत माहिती दिली
“महाराष्ट्रात येत्या एक-दोन दिवसांत नवीन सरकार स्थापन होईल आणि त्या सरकारचं नेतृत्त्व शिवसेना करेल. हे मी गेल्या 20-22 दिवसांपासून सतत सांगत आलो आहे. आता अखेर ती वेळ आली आहे, जेव्हा देशाची जनता पाहील, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिक विराजमान होईल. हे उद्धव ठाकरे यांनीही नेहमी सांगितलं की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर एक शिवसैनिकच बसेल, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.