भाजपच्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी धरलं धारेवर
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा देशात भाजपचीच लाट असल्याचं सिद्ध झालं. सोशल मीडियावर कर्नाटक निवडणूक निकालांच्या निमित्ताने अभिनेता प्रकाश राज यांच्यावरही अनेकांनी तोफ डागल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी कानडी जनतेने भाजपला मतं देऊ नये असं आवाहन केलं होतं. इतकंच नव्हे तर यादरम्यान त्यांची पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुद्दाही उचलून धरला होता.
भाजपला कर्नाटक निवडणूकांमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रकाश राज यांना नेटकऱ्यांनी चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. कर्नाटक विधानसभांच्या निवडणुकांपूर्वी त्यांनी ट्विट करत कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येणार नाही याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. पण, आता मात्र ते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकाश राज आता कुठे लपून बसले आहेत, ‘कोणीतरी त्यांना शोधा’, अशा आशयाचे ट्विट केले नेटकऱ्यांनी आहेत.