पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे 50 नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत परतणार !
- भाजप नेत्यांची बसली पाचावर धारण
- राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा धक्कादायक खुलासा
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्याच्या सत्तेतून भाजप हा पक्ष बाहेर फेकला गेला आहे. सत्ता गेल्यामुळे भाजप नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. आगामी काळात आपल्यासोबत कोणी राहणार नसल्याचे चित्र दिसताच पक्षाच्या नगरसेवकांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांची धरपकड सुरू आहे. परंतु, शरिराने भाजपमध्ये असले तरी मनाने राष्ट्रवादीशी सलोखा जपणारे नगरसेवक राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होताच स्वगृही (राष्ट्रवादीत) परतणार आहेत, असा खुलासा राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आज गुरूवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या शहरातील काही नगरसेवकांनी तिन्ही मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचे समोर आले आहे. याची कुणकुण लागताच भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी भाजप नगरसेवकांची आज महापालिकेत बैठक घेतली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे शहरातील कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी देखील महापालिकेतील शिवसेना गटनेत्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासा केले आहेत. यावेळी शिवसेना गटनेते राहूल कलाटे देखील उपस्थित होते.
प्रशांत शितोळे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 77 नगरसेवकांपैकी 50 नगरसेवकांनी भाजपच्याच उमेदवारांवर नाराजी व्यक्त केली. उलट त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवारांना भरघोस मतदान मिळवून दिले. त्यामुळे भोसरी वगळता हवेत उडणारे महायुतीचे उमेदवार जमिनीवर आपटले. हे समजताच शहरातील या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांची आज बैठक घेतली. पालिकेत सत्ता येऊन तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या तीन वर्षाच्या कार्यकाळात भाजप नेत्यांना त्यांच्या नगरसेवकांचे हित कधीच कळले नाही. आताच कसे त्यांच्यावरील प्रेम उफाळून जात आहे. हे संशयास्पद असून बैठक घेण्याचे नेमके कारण सर्वश्रृत असल्याचेही ते म्हणाले.
भाजप नगरसेवकांचा राष्ट्रवादीशी सलोखा
राज्यात सत्ता गेल्याची भीती शहरातील आमदारांना वाटू लागली आहे. राज्यात शिवमहाआघाडीची सत्ता स्थापन होताच भाजपचे 50 नगरसेवक राष्ट्रवादीत परतणार आहेत. मुळात ते राष्ट्रवादीचेच नगरसेवक होते. आज ते शरिराने भाजपमध्ये आहेत, मनाने मात्र राष्ट्रवादीशी सलोखा साधून आहेत. त्यामुळे आपल्यासोबत हे नगरसेवक येणार नसल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच या नेत्यांनी नगरसेवकांना कारवाईचा दम भरला आहे. त्यांनी त्यांचे काम केले नाही हे उघड आहे. सत्ता आली असतीच तर या नेत्यांनी या नगरसेवकांचा माज केव्हाच मोडला असता. परंतु, सत्तांतराच्या भीतीपोटी त्यांच्याकडून नगरसेवकांना लाडीगोडी लावण्याचाही प्रकार होत आहे, असेही प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे.