भाजपचे दहा आमदार राष्ट्रवादीत येणार
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती
मुंबई | प्रतिनिधी
महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होण्याची भाजप वात पाहत आहे. मात्र आता “भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, तेच राष्ट्रवादीत येणार असल्यचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीत आता लवकरच मेगाभरती होणार आहे”, अशी माहिती त्यांनी मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपमध्ये नाराज आहेत. उबग आलेली आहे. त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. लवकर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हणत जयंत पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली.
केंद्राकडून शेतकऱ्यांना उशिरा मदत मिळत असल्याच्या मुद्द्यावरूनही टीकास्त्र सोडलं. दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. केंद्र सरकारकडे आम्ही सतत मागणी केली असून, केंद्रानं पथक पाठवायला हवे. आता संकट सावरल्यावर टीम येते म्हणजे केंद्राचा राज्यांकडे पाहण्याचा दुजाभाव बदलला आहे. संकट आल्यावर शरद पवार केंद्रीय मंत्री असताना लगेच टीम यायची, राज्याला मदत मिळायची. आज मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, विशेषतः महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.