‘महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? मी म्हणालो,.. गुंडागर्जी, दादागिरी, दाऊद..’; भगतसिंह कोश्यारी
तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहेत
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्याजागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. राजीनामा स्वीकारल्यानंतर भगतसिंह कोश्यारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून चांगलीच टोलेबाजी केली.
महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत, शहरात असेल गुंडागर्जी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील, पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत. तुमच्याकडे देशपांडे आहेत, तर आमच्याकडे पांडे आहेत, तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.
कायफ पिकायला लागलं असेल, एकदा जाऊन खाऊन या. काफल खायला मिळेल, म्हणून मीदेखील चाललो आहे. उत्तराखंडच्या पहाडी भागामध्ये काफल हे फळ मिळतं, त्याबद्दलच कोश्यारी बोलत होते.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपने जेवढी बदनामी राज्यपाल महोदय यांच्या हस्ते करून घ्यायची होती तेवढी त्यांनी करून घेण्याचं काम केलं असे त्यांना वाटत असेल म्हणून राज्यपालांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने महापुरुषांचा अपमान केलेला आहे ते या राज्यातील जनता विसरणार नाही. राज्याची बदनामी करण्यासाठी असा बायस राज्यपाल भाजपने मुद्दामून बसविला होता, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.