“भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात”; राऊतांनी सांगितले…
शिवसेनेते नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बाजवल्यानंतर ईडीच्या या नोटीसवर संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
“ईडी दीड महीन्यांपासून आम्हाला पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी माहीती पाहीजे होती ती आम्ही दिली आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याबाबात कोणताही संदर्भ दिला नाही तरीसुद्धा भाजपची माकडं उडी मारत आहेत. यांची ईडी बरोबर हात मिळवणी आहे का? गेल्या तीन महीन्यांपासून ईडी कार्यालयावर माझं लक्ष आहे. भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात जात आहेत तेथून ते कागदपत्रे घेऊन येत आहेत”, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला
“तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येवून अटक करुन घेऊन जा. नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत, त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. जर हे करणार असाल तर खुशाल करा. ईडी, सीबीआयने ते करावं किंवा आमच्याविरोधात बाहेर कुणी दहशतवादी गँग असेल त्यांनी ते करावं. आम्ही हटणार नाहीत. या सरकारचा बालही बाका होणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपाच्या त्या तीन नेत्यांची नावं वेळ आली की आपण सांगूच, असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला.