breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
बैलगाडा शर्यत आंदोलन; आमदार महेश लांडगे यांना अटक
– ‘पेटा’ विरोधात राज्यव्यापी एल्गार
– चाकणमध्ये केला रास्ता रोको
चाकण – राज्यातील बैलगाडा सुरु करण्यासाठी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, याची काळजी घेण्यासाठी काहीकाळ आमदार लांडगे यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. आंदोलक पांगल्यानंतर लांडगे यांची सुटका करण्यात आली.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. सरकारने शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. राज्यात प्रथमच बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळावी, यासाठी व्यापक आंदोलन होत आहे. अनेक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन आंदोलनात सहभागी झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून ‘पेटा’ या संस्थेविरोधात जनआंदोलन उभारले आहे. त्यामुळे चाकणमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी भाषणाला सुरूवात करताच जमावाने जोरदार घोषणाबाजी करीत त्यांना साथ दिली. ‘पेटा’ विरोधात आता माघार घ्यायची नाही…पेटाला हटवून महाराष्ट्राची संस्कृती जपायची…असा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्या प्राणीमित्रांचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. चाकणमधील मार्केट यार्डपासून या आंदोलनाला सुरुवात झाली.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू सरकार नसून, पेटाचे कार्यकर्ते आहेत. या लोकांना बैल आणि वळू यातील फरक कळत नाही. शेक-याचे खोंड जन्मल्यावर दोन तासांत पळायला लागते. याची जाणीव ‘पेटा’च्या संबंधित कार्यकर्त्यांना नाही. त्यामुळे या अतिशहाण्या लोकांचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे.
————–
आता एकोपा दाखवा- आमदार लांडगे
सरकार पूर्णपणे शेतक-यांच्या बाजूने आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने बैलगाडा शर्यत सुरु होण्याबाबत शेतक-यांच्या बाजुने लढा दिला. न्यायालयात शेतक-यांची आणि राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी स्वखर्चाने वकील दिला आहे. एका-एका तारखेला २५ लाख रुपये वकीलांची फी द्यावी लागत होती. अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटनेच्या पदाधिका-यांना याची माहिती आहे. आता सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणार आहे. मात्र, राज्यात राजकीय श्रेयवादातून सरकारच्या भूमिकेबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आता चाकणमधील आंदोलनाप्रमाणे सर्व प्रकारचे मतभेद आणि श्रेयवाद बाजूला ठेवून राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी एकोपा दाखवावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.