‘बुलेट’चं राहू द्या, आधी लोकलसेवा सुरळीत करा; मुंबईकरांचा संताप
अंधेरी स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा वेगही बराच मंदावला आहे. दुसरीकडे हार्बर रेल्वेही स्लो झाली आहे. परिणामी सकाळीच कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळेल त्या मार्गाने कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांची धडपड सुरू आहे. ऑफिससाठी बाहेर निघालेले चाकरमानी पश्चिम रेल्वे मार्गावर ताटकळलेत. पोलीस पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना दिसत आहेत. पण या घटनेमुळे रस्ते मार्गावरही वाहतूक कोंडी दिसू लागलीय. याशिवाय मेट्रो स्थानकांवरही प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकलसेवाच कोलमडल्यामुळे अनेक मुंबईकरांनी सोशल मीडियावर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर तोंडसुख घेतलं आहे. आम्हाला बुलेट ट्रेनची गरज नाही, आधी आहे ती लोकलसेवा सुरळीत करा अशाप्रकारचे एकाहून एक ट्विट करुन अनेकांनी आपला संताप रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात व्यक्त केला आहे. यानिमित्ताने खरंच मुंबईकरांना सध्याच्या क्षणी बुलेट ट्रेनची नितांत आवश्यकता आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत असून यावरुन वाद सुरू होण्याची चिन्हं आहेत.