येत्या दिवाळीत भारतीय सैन्यांसाठी एक दिवा लावा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला आज सहा वर्षे पूर्ण झाली असून त्यांनी आज दसऱ्याच्या निमित्ताने मन की बातमधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दसऱ्याचा सण हा असत्यावर सत्याने मात करण्याचा सण तर आहेच शिवाय उत्सावाचं प्रतिक म्हणूनही हा सण साजरा केला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आता सण उत्सवांचे दिवस येणार आहेत. या काळात खरेदी केली जाते. यावेळी खरेदी करताना वोकल फॉर लोकल हा संदेश जरूर लक्षात ठेवा. स्थानिक वस्तूंना प्राधान्य देऊन स्वदेशी वस्तूच खरेदी करा.
तसंच, यंदाच्या दिवाळीत एक दिवा आपल्या भारतीय सैन्यांसाठी लावण्याचेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या सणकाळात आपल्याला आपल्या सैन्यांचीही आठवण ठेवणं गरजेचं जे सणउत्सवात देशाची रक्षा करत आहेत. आपलं कर्तव्य बजावत भारतमातेची सेवा करत आहेत. त्यांची आठवण काढून आपल्याला सण साजरे करायचे आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे.
डिसलाईकमुळे मन की बातची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट रोजी ‘मन की बात’ रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेशी संवाद साधला होता. परंतु या एपिसोडची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली होती. कारण ‘मन की बात’ या कार्यक्रमाला यू ट्यूबवर लाईकपेक्षा डिसलाईकच जास्त मिळाले होते. पीएमओ असो किंवा नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या यू ट्यूब चॅनलवर लाईकची संख्या डिसलाईकपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. या कार्यक्रमात मोदींनी नीट, जेईई किंवा रोजगारी अशा कोणत्याही मुद्द्यांवर भाष्य न केल्याने विद्यार्थ्यांनी आपला रोष डिसलाईकच्या स्वरुपात व्यक्त केला होता.
2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 70 वी मन की बात होती.