बुद्धी शुद्धीसाठी ओवेसी यांनी अनुलोम-विलोम प्राणायम करावा – बाबा रामदेव
लंडन (इंग्लंड) – बुद्धी शुद्धीसाठी ओवेसी यांनी दररोज अनुलोम-विलोम प्राणायम करावा, असा सल्ला योग गुरू बाबा रामदेव यांनी दिला आहे.एआयएमआयएम (ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांनी मुस्लिम उमेदवारांनाच मत देण्याचे आवाहन केले आहे, त्या संदर्भात बाबा रामदेव प्रतिक्रिया व्यक्त करत होते. ते म्हणाले, की ओवेसी यांनी दररोज अनुलोम-विलोम प्राणायम करावा. त्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध होईल.
धार्मिक उन्मादाने लोकशाहीला बळ येत नाही, तर राष्ट्रवाद, मानवतावाद, सामाजिक-आर्थिक आणि राजनैतिक न्याय यामुळे लोकशाही बळकट होते, असे त्यांनी सांगितले. सन 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या यशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, दलित, मुसलमान आणि अन्य मागास वर्ग यांची महाआघाडी झाली, तर भाजपाला चांगली टक्कर देऊ शकेल.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार केल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, निवडणूक लढवणे आणि पंतप्रधान बनण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र 2019 मध्ये मोदी पंतप्रधान होण्याबाबत प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले.
मादाम तुसॉं याच्या स्टुडियोतील आपल्या मेणाच्या पुतळ्यासाठी मापे देण्यास बाबा रामदेव येथे आलेले आहेत. मादाम तुसॉंच्या संग्रहालयात बाबा रामदेव यांचा वृक्षासनातील पुतळा ठेवण्यात येणार आहे.