बिहारमधील गुंडगिरी-होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण
- 34 मुली जखमी, 12ची अवस्था गंभीर
सुपौल -मुलींच्या होस्टेलमध्ये घुसून गुंडांनी मुलींना मारहाण केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. 34 जखमी मुलींना हॉस्पिटल्मध्ये दाखल करण्यात आले असून त्यापैकी 12 जणींची अवस्था गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वमुली 12 ते 16 या वयोगटातील आहेत.
शनिवारी संध्याकाळी त्रिवेणीगंज येथील कस्तुरबा निवासी शाळेतील काही मुली मैदानात खेळ्त होत्या. त्यावेळी गावातील काही गुंड मुले येऊन त्यांची छेड काढू लागली. मुलींनी शिक्षकांकडे तक्रार करताच शिक्षकांशीही वाद घालून ते निघून गेले आणि काही वेळाने आपले पालक व नातेवाईकमंडळींसह होस्टेलमध्ये घुसून त्यांनी लाठ्याकाठ्यांनी मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिक्षक मध्ये पडताच त्यांनी शिक्षकांनाही मारहाण केली.
नंतर सर्व जखमीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण करणारांची ओळख पटली असल्याचे एसडीओ विनय कुमार यांनी सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून बाकी सहाजणांचा शोध चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
होस्टेलधील मुलींना गुंड नेहेमीच त्रास देतात. हॉस्टेलच्या भिंतींवर ते गलिच्छ गोष्टी लिहितात असे मुलींनी सांगितले.
रात्री उशिरा खासदार रंजित रंजन यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलींची विचारपूस केली. होस्टेलमधील मुलींसाठी काही सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल त्यांनी शासन-प्रशासनाला धारेवर धरले आहे.
विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी गुंडाराजबद्दल नितीश कुमार सरकारवर टीका केली असून हे सरकार गुंड़ांना शरण गेले असल्याचे म्हटले आहे.