बालभारतीकडून चौकशीसाठी साधा फोनही आला नाही
तक्रारीनंतर पालकांची व्यथा : शिक्षणमंत्र्यांकडेही तक्रार, मात्र तेथेही निराशाच
पुणे – बालभारतीचा क्यू आर कोड स्कॅन केल्याने तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली असल्याचे सांगणाऱ्या फोन कॉलविरोधात बालभारतीकडे दि. 21 जून रोजी तक्रार केल्यानंतर अद्यापही बालभारतीकडून चौकशीखातर साधा फोनही आला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या दुसऱ्याच दिवशीही तक्रार शिक्षणमंत्र्यांनाही पाठवली असून त्यांच्याकडूनही अद्याप काहीच प्रतिसाद न आल्याने मुले शिकवावी तरी कशी, असा प्रश्न संबंधित पालकाला पडला आहे.
बालभारतीच्या पुस्तकावर छापण्यात आलेला “क्यू आर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्याद्वारे आम्ही दीक्षा ऍप डाऊनलोड केले व त्यानंतर माझ्या मुलीला तीस हजार रुपयांची मागणी करणारा फोन आला असल्याची तक्रार पालकांनी केली. ही तक्रार पालकांनी पोस्टाने बालभारतीला पाठवून दिली होती. तसेच लगचेच दुसऱ्या दिवशी याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही ही तक्रार पाठविण्यात आली होती. हा एकूणच प्रकार काय आहे, याचा बालभारतीशी काही संबंध आहे का, असेल तर पैसे मागितले हे खरे आहे का, व नसेल तर याची चौकशी करावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून पालकांनी केली होती. मात्र त्याला अद्यापही आम्हाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ज्या व्यक्तीकडून ही पैशांची मागणी फोनच्या माध्यमातून केली जात होती. त्या व्यक्तीनेही फोन करणे बंद केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर एकदाही फोन आला नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. या एकूणच प्रकरणाबाबत बालभारतीला पालकांची तक्रार प्राप्त झाली का, व झाली असल्यास त्यावर काय कार्यवाही केली आहे का, याबाबत बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्याकडे विचारणा केली असता त्याबाबत प्रतिसाद मिळू शकला नाही.