फडणवीस सरकारने पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले : शिवसेना
मुंबई – राज्यात काल नव्या सरकारचा शपथविधी झाला आणि आज सकाळीच सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. ‘फडणवीस सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले आणि फडणवीस सरकार गेले,’ असा आरोप या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यासाठी केंद्राची भूमिका सहकार्याची हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल,’ अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.