जागा वाटपाची चर्चा योग्य वेळी होईल – अखिलेश यादव
लखनौ – बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागा वाटपाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही किंवा चर्चाही झालेली नाही. या विषयावर आमच्यात योग्य वेळी चर्चा होईल अशी माहिती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली.
उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी बहुजन समाज पक्षाला किमान चाळीस जागा मिळाल्यातरच आमची आघाडी होईल असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केल्याचे अलिकडेच छापून आले आहे त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की या केवळ वृत्तपत्रीय बातम्या आहेत त्यातले काहीही खरे नाही.
पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की आमचे मन मोठे आहे. त्यामुळे जागा वाटपाबाबत समझोता करताना काही अडचण येईल असे वाटत नाही. कैरानाची जागा भाजपकडून विरोधी आघाडीने खेचुन घेतली आहे त्याविषयी बोलताना ते म्हणाले की तेथील मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान करून दंगलीतील जखमांवर मलम लावले आहे.
समाजवादी पक्ष मध्यप्रदेशबरोबरच छत्तीसगड आणि राजस्थानातही निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे असे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेशातील सर्व जागा आम्ही लढवणार आहोत असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.