फडणवीसांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच मी राजीनामा दिला, भाजप आमदाराचा आरोप
मुंबई । भाजप-शिवसेनेतील समसमान सत्तावाटपाचा तिढा सुटत नसतानाच भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लबाडीच्या वागण्यामुळेच मी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. फडणवीस शब्दांचे खेळ करतात, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. या आरोपात मला गैर काही वाटत नाही. मला याचा अनुभव असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.
गोटे यांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा खुला आरोप उध्दव ठाकरे यांनी केला आहे. याचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण माझा स्वतःचा अनुभव या पेक्षा वेगळा नाही. देवेंद्र फडणवीसांच्या अशा लबाडीच्या वागण्यामुळेच मी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलो होतो. फडणवीस यांच्याकडून सत्याची अपेक्षा करणे म्हणजे धोत्र्याच्या फुलाकडून गुलाबाची अपेक्षा करण्यासारखे आहे, असेही गोटे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.