फटाक्याची आग लागून चार वाहने जळून खाक
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
चाले (ता. मुळशी) येथे कार्यालयात लग्नानंतर फटाके वाजवल्याने आग लागून दोन चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. लग्न लागल्यानंतर वाजवण्यात आलेले फटाके रस्त्याच्याकडेला असलेल्या गवतात पडून गवताने पेट घेतला. पेटलेल्या गवतामुळे पार्किंगमधल्या गाड्याना आग लागली. या आगीत सुमारे दहा लाखांच्यावर नुकसान झाले आहे. सर्व जण कार्यालयात असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नसल्याने कार्यालयातील टँकरने पाणी टाकून गाड्या विझवण्यासाठी उपस्थितांनी मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. तर बाजूला असलेल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी मोठी धांदल उडाली होती. घटनेच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही.
यामध्ये कोथरूड येथील दीपक सातपुते यांची स्कोर्पिओ (क्र. एमएच १२ ए. वाय. ५४४४) तर पौड येथील रविंद्र ओंबळे यांची बलेनो (क्र. एमएच १२ पी. टी. ६०७५) आणि दोन दुचाकी ही वाहने पूर्णपणे भस्मसात झाली.
घटनेनंतर फार उशिराने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीच्या ठिकाणी मोपेड व अजून एक दुचाकी जळून खाक झाली. ही आग विझविण्याठी राजाभाऊ साठे, राहूल साठे, सुभाष साठे, चंदा केदारी, उज्ज्वला मारणे, राहुल साठे, सुभाष साठे यांनी प्रयत्न केले.