प्लॅस्टिक बंदीचा निर्णय नेमका कशासाठी? : राष्ट्रवादी कॉंग्रेस
मुंबई : प्लॅस्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जर घेतला गेला असेल, तर आम्ही त्याचे स्वागत करतो. पण, की जनतेला त्रास देणे, बेरोजगारीला आमंत्रण देणे यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहेम असे दिसून येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्लॅस्टिकबंदीवर मलिक यांनी मत मांडले.
सरकारने ब्रँडेड वस्तूंच्या पॅकेजवर बंदी घातली नाही. बाजारात मल्टिनॅशनल कंपन्यांच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यांच्या पॅकेजेसची रिसायकलिंग होत नाही. रिसायकल म्हणजे काय हेच सरकारमधील मंत्र्यांना कळलेले नाही. सरकारने कँडी, माऊथ फ्रेशनर, लेस, बिस्कीट, टूथपेस्ट या पॅकेजवर बंदी घातलेली नाही. खरंतर या वस्तूंच्या आवरणांचा पुनर्वापर होत नाही. प्लॅस्टिक नाईफ, चमचा, ग्लास, कॅरी बॅगवर बंदी घातली गेली. कचरा वेचणारे व्यक्ती या वस्तू जमा करतात आणि भंगारमध्ये विकतात. या सगळ्या गोष्टी रिसायकल होतात. मग या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.