प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यास विराट तयार -गांगुली
कोलकाता : प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा कर्णधार विराट कोहली तयार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले.
‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात कोहलीशी झालेल्या बैठकीबाबत गांगुली म्हणाला, ‘‘प्रकाशझोतामधील कसोटी सामने खेळण्यास कोहली तयार नाही, अशा प्रकारची चर्चा होत होती. परंतु यात तथ्य नाही. कसोटी क्रिकेटला पुढे जाण्यासाठी ते आवश्यक आहे. याबाबत आमचे एकमत झाले आहे.’’
ईडन गार्डन्स स्टेडियमवर बंगाल क्रिकेट संघटनेकडून झालेल्या विशेष सत्कारानंतर गांगुली म्हणाला, ‘‘मी दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटी सामन्याचा समर्थक आहे. हे प्रत्यक्षात केव्हा होईल, हे मला माहीत नाही. परंतु मी पदावर असेपर्यंत त्याचा पाठपुरावा करीन.’’
गांगुलीचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील वर्षी वर्षी जुलै महिन्यात संपणार आहे. परंतु भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर पुढील कसोटी सामने थेट डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत खेळणार आहे.