पोस्ट खात्यातही किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक, अन्यथा खाते होणार बंद
मुंबई – खासगी बँकांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचं बंधन आता इंडिया पोस्ट ऑफिसनेही सुरू केले आहे. त्यानुसार, पोस्टाच्या खात्यात आता किमान शिल्लक रक्कम म्हणून ५०० रुपये ठेवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. अन्यथा देखभाल शुल्क म्हणून १०० रुपये वजा केले जाणार आहेत. इंडिया पोस्ट ऑफिसनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
इंडिया पोस्टाने ट्विटरवर लिहिले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी लवकरच तुमच्या खात्यात किमान 500 रुपये जमा करावेत. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभाल फीच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार आपल्याकडे आर्थिक वर्षाच्या शेवटी बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक नसतील, तर खाते देखभाल शुल्क म्हणून 100 रुपये वजा केले जातील. जर बचत खात्यात जमा केलेली रक्कम शून्य झाली असल्यास ते खाते बंद केले जाईल.