पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा – छत्रपती संभाजीराजे
मुंबई – राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त लोकांची भरती होणार आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी टीका केली आहे. महाविकास आघाडीने १२,५०० जागांच्या पोलीस भरतीचा घेतलेला निर्णय हा मूर्खपणाचा असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाज पेटून उठणार आहे. मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे त्यासोबतच राज्यावर कोरोनाचा प्रकोप आहे. अशावेळी पोलीस भरती करणे कितपत योग्य आहे?, असा सवालही छत्रपती संभाजीराजेंनी केला आहे.दरम्यान, पोलीस भरतीच्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसंच या भरतीसाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.