पोलीस निरीक्षकाची हत्या एक अपघात, मॉब लिंचिंग नाही – योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची जमावाकडून झालेली हत्या हा अपघात असल्याचं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ही घटना जमावाकडून मारहाण करण्यात आलेली हत्या नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात गोहत्येच्या संशयातून झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. यामधील एकजण पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह होते. हिंसाचारानंतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘उत्तर प्रदेशात जमावाकडून मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नाही. बुलंदशहरधील घटना एक दुर्घटना आहे. यामध्ये कायदा आपलं काम करत आहे. दोषींना सोडलं जाणार नाही. गोहत्येवर संपूर्ण उत्तर प्रदेशात बंदी आहे. यासाठी अधिकारी उत्तरदायी असतील’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अजून पाच जणांना अटक केली आहे. यासोबत अटक झालेल्यांचा आकडा नऊवर पोहोचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्यांची नावे चंद्रा, रोहित, सोनू, जितेंद्र आणि नितीन आहे. हे सर्वजण सियानाचे रहिवासी असून पोलीस त्यांची अधिक माहिती मिळवत आहेत.
दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी लष्कराला संपर्क साधला आहे. एफआयरमध्ये एका लष्कर जवानाचं नाव असून त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांना संशय आहे की, जितेंद्र मलिक हा जवान बुलंदशहरात आला होता आणि हिंसाचारात सहभागी होता. तो फरार झाल्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये जितेंद्र मलिक फायरिंग करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान मलिकच्या आईने त्याचा हिंसाचाराशी काही संबंध नसल्याचं सांगितलं आहे.