पोलिसांकडील पुरावे बनावट…
- अटक झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप
नवी दिल्ली – माओवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखवलेले पुरावे बनावट आहेत, असा आरोप या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. वकील आणि कार्यकर्त्या सुधा भारद्वाज आणि अन्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडील पुराव्यांच्या सत्यतेबाबतच शंका उपस्थित केली आहे.
गुन्हेगारांशी आपण आणि मानवी हक्क संघटना संबंधित असल्याचे पुरावा म्हणून दाखवले गेलेले पत्र म्हणजे “निव्वळ बनवेगिरी’ असल्याची टीका सुधा भारद्वाज यांनी केली आहे. फरिदाबादेतील भारद्वाज यांनी “कोम प्रकाश’ ला हे पत्र लिहीले असल्याचा दावा पोलिसांनी शुक्रवारी केला होता. मात्र भारद्वाज यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हे पत्र बनावट असून पुणे पोलिस किंवा फरिदाबादचे मुख्य दंडाधिकाऱ्यांपुढे आणण्यात आले नव्हते. आपला पुण्याशी कोणताही संबंध नसल्याचेही त्या म्हणाल्या.
कोरेगाव भीमाच्या मुख्य दोषींवरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठीच ही कारवाई झाल्याचा आरोप वेरोन गोन्सालविस यांच्या पत्नी सुसान अब्राहम यांनी केला आहे. छाप्यांदरम्यान वस्तू जप्त करण्यासाठी पोलिसांनी योग्यपद्धत अवलंबली नाही, असेही त्या म्हणाल्या.
या कार्यकर्त्यांचे माओवाद्यांशी असलेले संबंध उघड करताना पोलिसांनी अनेक पुरावे पत्रकारांसमोर मांडले होते. मंगळवारी पोलिसांनी वरवरा राव यांना हैदराबादेत, गोन्सालविस आणि अरुण फरेरा यांना मुंबईत, भारद्वाज यांना फरिदाबादेत आणि गौतम नवलखा यांना दिल्लीत अटक केली होती.