पेणमध्ये मालगाडीखाली चिरडून तिघा तरुणांचा जागीच अंत
रायगड : पेणमध्ये तिघा तरुणांना मालगाडीने चिरडल्याची दुःखद घटना समोर आली आहे. रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना चिरडले. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील पेण शहराजवळ घडलेल्या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे.
25 वर्षीय सुशील वर्मा, 24 वर्षीय सुनील वर्मा आणि 25 वर्षीय निखिल गुप्ता यांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. मात्र हा अपघात आहे की घातपात याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.
शनिवारी रात्री सुनील वर्मा, सुशील वर्मा आणि निखिल गुप्ता हे तीन तरुण पेण रेल्वे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर गेले होते. यावेळी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पेण रेल्वे स्टेशनवरुन एक मालगाडी रोह्याच्या दिशेने जात होती.
मालगाडीने ट्रॅकवर बसलेल्या या तिघा तरुणांना चिरडले. अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तिघे तरुण रेल्वे रुळावर कशासाठी गेले होते, हा नेमका अपघात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.