आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ‘इंद्रायणी काठी १५६’ या पुस्तकाचे प्रकाशन
आळंदी : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इंद्रायणी काठी १५६ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. कोरोनाच्या काळात जलाराम सत्संग मंडळ आळंदी यांचे अन्नदान इंद्रायणी घाट, पालिका शाळा व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय व विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या १५६ दिवसाच्या काळात गरजवंताला अन्नदान पोहचवण्याचे सहकार्य अजित वडगांवकर व त्यांचे कुटुंबीय, सहकारी यांनी केले. याबद्दलची व त्यावेळेस ची परिस्थितीची तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची माहिती यांचे लेखन या पुस्तकात केले आहे.
यावेळी कॉसमॉस बँक अध्यक्ष पुणे मिलिंद काळे, मा. उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य- जि. प.पुणे श्री पांडुरंग पवार यावेळेस म्हणाले वडगांवकर कुटुंबातील व्यक्तींनी कोरोनाच्या काळात कठीण परिस्थितीत १५६ दिवस समाजसेवेचे कार्य केले. त्यांना माउलींनीच प्रेरणा देऊन हे कार्य त्यांच्या हातातून घडवले. त्या कोरोनाच्या परिस्थितीत लोकांची काळजी घेतली. विश्वस्त प्रकाश काळे व शिक्षक, शिक्षिका यांनी ही त्यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अजित वडगांवकर म्हणाले आपल्याकडे असणारे ज्ञान, भांडवल, श्रम हे जीवन समाज उपयोगी पडले पाहिजे. मनात अहंकार न ठेवता कार्य केले पाहिजे. कोरोनाच्या १५६ दिवसाच्या काळात आळंदी ग्रामस्थ, गावातील पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या सहकारी, अन्नदान करणाऱ्या विविध संस्थेंचे त्यांनी आभार मानले. जलाराम सत्संग मार्फत केलेल्या करोना काळातील १५६ दिवसांच्या अन्नदान सेवा गरजवंताला पोहचवणे या कार्याची व्हिडिओ चित्रफीतद्वारे माहिती दिली. प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प.पंकज गावडे यांनी अध्यात्म व समाजसेवा या विषयावर व्याख्यान केले. या व्याख्यानात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज संत मुक्ताई, संत नामदेव व इतर संतांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना जीवन चरित्र यांचे वर्णन केले. सद्यस्थितीवर समाज प्रबोधन करून मार्गदर्शन केले.