पुण्यातील 115 शहीद जवानांच्या कुटूंबियांना अधिका-यांनी घेतले दत्तक
पुणे – शहीद जवानांच्या कुटुंबांच्या समस्या सोडवणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी ११५ कुटूंबियांना दत्तक घेतले आहे. याकरिता सर्व जिल्हयामध्ये मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री, म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार (निवृत्त) जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, शहिदांच्या कुटूंबियांसाठी योजना खूप असतात. मात्र, योग्य मार्गदर्शन झाले नाही तर त्याचा फायदा घेता येत नाही. शासनाकडून मिळणारी मदत लवकर मिळवून देण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र येऊन प्रयत्न करणार आहेत. जमीनीच्या मुलांच्या शाळेच्या अडचणी, आरोग्य, कागदपत्रे आदी समस्या आहेत. या समस्येची सोडवणूक या अधिकाऱ्यांकडून केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन माणसं या देशात समर्पन देतात ते म्हणजे शेतकरी आणि सैनिक. पण दोघांचीही स्थिती सध्या चांगली नाही. यामुळे पूर्ण विभागात हा उपक्रम राबविला जाईल असे ते म्हणाले.
सूरज मांढरे म्हणाले, या कुटूंबियांच्या निरंतर पाठीशी कुणी तरी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी मदतीचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच ११५ कुटूंबियांना मदत केली जाणार आहे. धोरणात्मक बदलासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. तर या ११५ कुटुंबायांची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यांना विभागून दिली आहे. त्यांना येणाऱ्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत सोडवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.