पावसाची दमदार हजेरी ; रेल्वेची सेवा विस्कळीत
मुंबई – रात्रभर मुंबईला झोडपल्यानंतरही पावसाचा जोर कायम आहे. याचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल गाड्या 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. मध्य आणि हार्बरवरील लोकलदेखील 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवसांमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
रात्रभर मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. दिवस उजाडल्यावरही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रात्रभर झालेल्या पावसानं नालासोपाऱ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे विरारहून सुटणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावला आहे. मध्य रेल्वेलादेखील पावसाचा फटका बसला आहे. सायन, माटुंगा, दादर, वरळी, लालबागमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसरला पावसानं चांगलंच झोडपलं आहे.