पाकिस्तान म्हणतंय कोणी ‘चहा देतं का चहा’; भारत करणार मदत?
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यातच दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या परस्पर व्यापारावरही याचा परिणाम झाला आहे. परंतु आता पाकिस्तानला भारताकडून चहा विकत घ्यावा लागणार आहे.
चहाचे उत्पादन करणाऱ्या चार प्रमुख देशांमधील केनया हा एक महत्त्वाचा देश मानला जातो. केनयामध्ये यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चहाचे उत्पादनही कमी झाले आहे. त्यामुळे केनयावरून चहाची आयात करणे हे पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. आता चहाची आयात करण्यासाठी पाकिस्तान भारताकडे मागणी करू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्यावर्षी भारताने पाकिस्तानला 1.58 कोटी किलो चहाची निर्यात केली होती. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला होता. तसेच पाकिस्तानला होणाऱ्या निर्यातीवर 200 टक्के निर्यात कर लावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अशा परिस्थितीतही पाकिस्तानला मिळणारा चहा हा केनयातून मिळणाऱ्या चहापेक्षा कमी दराने मिळणार आहे.
2007 ते 2016 या कालावधीत पाकिस्तानात प्रति व्यक्ती चहाची विक्री 36 टक्क्यांनी वाढली आहे. पाकिस्तानात 2027 पर्यंत चहाची विक्री वाढून 2,50,800 टन पर्यंत पोहोचेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन’ने व्यक्त केला आहे. सध्या पाकिस्तानात 1,72,911 टन चहाची विक्री होते.
भारतात उत्पादन होणाऱ्या चहाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 2018 मध्ये रशियाने भारताकडून तब्बल 4.8 कोटी किलो चहा विकत घेतला होता. तर इराणने 3.6 कोटी किलो आणि इजिप्तने 1.13 किलो कोटी चहा विकत घेतला होता. सध्या भारत इराणमध्येही चहाची निर्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.