पाकिस्तानी सैनिकांचे सीमेलगत थैमान
- बीएसएफ जवान शहीद; चार नागरिकांचा मृत्यू; बारा जखमी
- पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूूर्वी जम्मूत मारा
जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी आज आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगत अक्षरश: थैमान घालत भारतीय हद्दीत जोरदार मारा केला. त्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला, तर चार भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले. याशिवाय, बारा जण जखमी झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधी भंगाचे सत्र चालूूच ठेवत सलग चौथ्या दिवशी मारा केला. त्यांनी आज सीमेलगत असणाऱ्या जम्मूमधील भारतीय सीमा नाक्यांना आणि खेड्यांना लक्ष्य केले. सीमेवर तैनात असणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूच्या आर.एस.पुरा, बिष्णाह आणि अर्निया क्षेत्रांमध्ये तोफगोळे डागतानाच जोरदार गोळीबारही केला. त्यामध्ये झारखंडचे रहिवासी असणारे बीएसएफचे कॉन्स्टेबल सीताराम उपाध्याय (वय 28) जखमी झाले. उपचारासाठी रूग्णालयात नेले जात असताना त्यांचे निधन झाले. पाकिस्तानी माऱ्यात बीएसएफचा एक अधिकारीही जखमी झाला. याशिवाय, एका जोडप्यासह चार नागरिक मृत्युुमुखी पडले. पाकिस्तानी माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर देताना बीएसएफच्या जवानांनी त्यांच्या नाक्यांवर निशाणा साधला. त्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याची माहिती त्या देशातील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांवरून समोर येत आहे.
नागरिकांची निदर्शने; पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी
पाकिस्तानी माऱ्यात जीवितहानी झाल्याने सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. निष्पापांना लक्ष्य करत असल्याबद्दल पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी त्यांनी केली. पाकिस्तानकडून सलग चार दिवस सुरू असलेल्या माऱ्यामुळे सीमेलगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी चालू वर्षात आतापर्यंत 700 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय हद्दीत मारा केला आहे.