पाकिस्तानातील टोळधाडीची महाराष्ट्रात एन्ट्री, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं संकट, शेतकऱ्यांना धास्ती
नागपूर | मध्यप्रदेशातून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी भागातून टोळधाड म्हणजेच नाकतोड्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वी कोट्यवधींच्या संख्येने ही टोळधाड प्रचंड मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यातील पूर्वी टोकावरील वरुड आणि मोर्शी भागात दिसले होते. मात्र, तिकडे शेती आणि वनस्पतींना फारसं नुकसान न पोहोचवता या टोळधाडीने नागपूर जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे.
काल संध्याकाळपासून कोट्यवधी नाकतोड्यांची ही झुंड काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही भागात उडताना दिसले. कर्कश आवाज करत या नाकतोड्यांनी परिसरातील हिरव्या झाडांवर आपला बस्तान मांडलं आहे. शेतातील हिरवी पिकं आणि हिरव्या झाडांना हे नाकतोडे निशाणा बनवत असून त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्या आगमनानंतर शेतकरी चिंतेत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कडुलिंबाची पाने जाळून धूर करत या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे उपायही सुरु केले. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला नाही. काटोल तालुक्यात पारडसिंगा, खामगाव, डोंगरगाव, येरळा तर नरखेड तालुक्यात जलखेडा.
भारसिंगी, थडीपवनी या भागात नाकतोडे मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. काही दिवस राजस्थान आणि मध्यप्रदेशात धुमाकूळ घालत पिकांचे मोठे नुकसान केल्यानंतर आता त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कृषी विभागाने बाधित क्षेत्रात फवारणी करून या नाकतोड्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरु केले असले तरी ते प्रयत्न अपुरे ठरत आहेत.