पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होऊ शकतो, लष्करप्रमुख मनोज नरवणेंना विश्वास
नवी दिल्ली | भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी आज पहिली पत्रकार परिषद घेतली. पहिल्याच पत्रकार परिषदेत नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्र सरकारने आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, असं नरवणे यांनी म्हटलं.
जम्मू-काश्मीर भारताचा भाग आहे आणि केंद्र सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग होऊ शकतो. तशी प्रकारची कारवाई आम्ही करु शकतो, असं नरवणे यांनी म्हटलं. सियाचिन भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे. देशाची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे, असंही लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.
भारतीय सेना आधीच्या तुलनेत आता खुप बलाढ्य झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर भारतीय सेनेची करडी नजर असते. पाकिस्तानच्या कुरघोडींवर योग्य ती कारवाई करण्यात भारताला यश येत आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली.