पाऊस परतण्याचा सांगावा…
पुणे – पंधरवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
गेले दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाची ही उघडीप आता संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल परिसरात कार्यरत होणार आहे. या क्षेत्राची तीव्रता सोमवार ते गुरुवारदरम्यान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारतासह पश्चिम किनारपट्टीत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह बिहार, पश्चिम बंगालमध्ये चांगला पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तर, घाटमाथ्यावरही पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यात शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या. पण, रविवारी पुन्हा विश्रांती घेतली.