breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवना नदीवर शिवणे आणि गहुंजेत महापालिका कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणार!
पिंपरी । प्रतिनिधी
पवना धरणातून थेट पाइपद्वारे पिंपरी चिंचवडला पाणी नेल्यास शेतीला मिळणार नाही, या हेतूने मावळातील शेतकऱ्यांचा जलवाहिनीला विरोध आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी पवना नदीवर शिवणे व गहुंजे गावांजवळ कोल्हापूर पद्धतीचा (केटी) बंधारा बांधण्यास महापालिकेची तयारी आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्ती व संकल्पचित्र करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारच्या जेएनएनयुआर योजनेअंतर्गत पवना धरणातून निगडी-प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम २००८ मध्ये सुरू झाले. त्याला विरोध करण्यासाठी २०११ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला. तेव्हापासून जलवाहिनीचे काम बंद आहे.