अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली – मुंबई पोलिसांची कोर्टात माहिती
मुंबईः रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अर्णव गोस्वामी यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (बीएआरसी) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. सदर अहवाल मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.
“पार्थो दासगुप्ता ‘बीएआरसी’चे सीईओ असतानाच्या काळात अर्णव गोस्वामी आणि इतर आरोपींनी रिपब्लिक भारत हिंदी वृत्तवाहिनी आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी वृत्तवाहिनीच्या टीआरपीत चुकीच्या पद्धतीनं वाढ करण्यात आली. टीआरपी वाढवून दाखविण्यासाठी गोस्वामी यांनी दासगुप्ता यांना अनेकदा लाखो रुपयांची लाच दिली, असं चौकशीत समोर आलं आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिली. पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
वाचा- कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट? दोन रुग्ण पॉझिटिव्ह; 106 जणांचा पत्ताच सापडेना!
पार्थो दासगुप्ता यांच्यासह ‘बीएआरसी’चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासोबतच बार्कच्या आणखी काही माजी कर्मचाऱ्यांचा टीआरपी घोटाळ्यात हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
‘बीएआरसी’च्या सध्याच्या व्यवस्थापनाने थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टनुसार तपास केल्यानंतर काही नावं पुढे आली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकसत्र सुरु केलं. रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी बीएआरसीच्या माजी कर्मचाऱ्यांनी केलेले ईमेल प्राप्त झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.