पर्यावरणवाद्यांवर उद्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो – अखिलेश यादव
मुंबईतील आरे वृक्षतोडप्रकरणावर राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरेतील झाडे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पर्यावरणवाद्यांवरही उद्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टिकास्त्र सोडलं आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडिपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही आरे प्रकरणी सरकारची हुकूमशाही भुमिका असल्याचे म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी ट्विटद्वारे म्हटले, “भाजपाला पर्यावरणवाद्यांचीही आता भीती वाटत आहे. आज झाडं वाचवणे गुन्हा ठरत आहे उद्या या पर्यावरणवाद्यांवर देशद्रोहाचा आरोपही लागू शकतो. आंतरराष्ट्रीय मंचावर एकीकडे पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टी सुरु आहेत तर दुसरीकडे देशातील जंगले नष्ट होत आहेत. गांधीजींनी म्हटले होते की, जंगलांबाबतच्या कृतीतून माणसाची मानसिकता प्रतित होते.”
तर दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती यांनी देखील ट्विट करुन आरेतील या वृक्षतोडीचा विरोध करीत त्याविरोध आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. कारण उद्या तुमच्यावर अशीच वेळ आली तर तुमच्यासाठी कोणीही आवाज उठवणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.